सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

राजकीय शुभेच्छा

सध्या महाराष्ट्रात अनेक युद्धे, शीतयुद्धे चालू आहेत. ठाकरे बंधूंचे मराठी युद्ध, मराठी-उत्तरभारतीयांचे युद्ध, भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे आपापसात युद्ध, अशी अनेक युद्ध चालू आहेत. पण हि अर्थात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात चालू आहे. परंतु महाराष्ट्र भर जे एकमेव युद्ध चालू आहे ते म्हणजे "होल्डिंग युद्ध". महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा विविध राजकीय पक्षांची, राजकीय वरदहस्त असलेल्या संस्थांचे शुभेच्छा संदेश देणारे, अभिनंदनाचे, वाढदिवसांचे होल्डिंग दिसल्याशिवाय राहणार नाही. यात कुठलाही पक्ष पिछाडीवर नाहीये. शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस,रिपब्लिकन  यांच्या पुढाऱ्यांच्या फलकांच्या "फ्लेक्स"चे पेव फुटले आहे. या फलकांना फ्लेक्स म्हणतात हि मला नवीनच माहिती मिळाली. संगणक, डिजिटल प्रिंटींग मधील आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे फ्लेक्स फारच स्वस्तात आणि भव्य आकारामध्ये म्हणजे अगदी दोन-दोन मजले उंच देखील मिळू शकतात. 
या मोठमोठ्या फलकांमध्ये काहीही मजकूर असू शकतो "जीवेत शरद: शतम", भाऊंची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा, लालबागच्या राजाकडून सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत, जय शंभो प्रतिष्टान, A1 तोरन महोत्सव. सणांमध्ये या युद्धाला विशेष जोर येतो, दिवाळीच्या शुभेच्छा, ईद मुबारक, शिमग्याच्या शुभेच्छा अशा आणि अनेक. शुभेच्छुक म्हणून विविध राजकीय पक्षांचे होतकरू म्होरके असतात. शुभेच्छा संदेश कुठलाही असू दे त्या मध्ये त्या पक्षातील समस्त राजकारण्याचे फुल साईज पांढऱ्या स्वच्छ पोशाखातील फोटो मात्र असणारच.
उदाहरणासाठी असे समजा कि काँग्रेस पक्षातील बुरुम्बाड गावाचा एक नेता मा.श्री.सदाभाऊ सदावर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा फलक आहे. फलक साधारण असा असेल, पार्श्वभूमीवर सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण यांचे जुन्या पिक्चरच्या जाहिरातीत 'बॉर्डर' वगेरे मध्ये असतात तसे फोटो, पुढे एका वर्तुळात उत्सवमुर्तींचा फोटो, खाली मजकूर 
                                    "जीवेत शरद: शतम"             
मा.श्री.सदाभाऊ सदावर्ते उर्फ तात्या (सरपंच-बुरुम्बाड) यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा
 शुभेच्छुक- श्री.शरद गवई, श्री.राज, एकता मित्र मंडळ,अफजल, इस्माईल फ्रेंड सर्कल 
(याच्या खाली वर नावे असलेल्या सगळ्यांचे फोटो-अर्थात पांढऱ्या कपड्यात)


अशा प्रकारच्या मोठमोठ्या फलकांनी शहरातील सर्व रस्ते, चौक, आणि काही इमारतीही व्यापल्या गेल्या आहेत. आधीच शहरात सर्वत्र घाण आहेच त्यात या 'फ्लेक्स' नि जमीनीवरचा भागही घाण  करून टाकला आहे, साहजिकच शहरांच रूप अजूनच विद्रूप झालंय. पुण्यामध्ये या गणेशोत्सवामध्ये जवळपास प्रत्येक मंडळातर्फे गणेश भक्तांचे स्वागत करणारे फलक लावले होते त्यात मंडळाचे सर्व कार्यकर्ते फोटोसकट आपणास दिसले असते. आमच्या घरजवळच्या एका फलकामध्ये कार्यकर्त्यांचेच जवळपास २५-३० फोटो होते कि मूळ शुभेच्छा संदेशच काय पण गणपतीसुद्धा दिसत नव्हता. 
मध्यंतरी कॉर्पोरेशननी या प्रकारच्या फलकांवर शुल्क आकारलं होतं. अर्थात कुणीही हे शुल्क भरत नाही. कारण कायदे करणारे पण तेच आणि मोडणारे पण. तसं पाहिलं तर ह्या प्रकारच्या फलकांना काहीच अर्थ नाहीये, महाराष्ट्राच्या कुठल्यातरी कोपऱ्यात नवनिर्वाचित राजकीय पदाधिकाऱ्यांचा अभिनंदनपर होल्डिंग अथवा फलक लावून काय साध्य होणार आहे हे ते फलक लावणारेच जाणोत. एक गोष्ट मात्र नक्की कि शहरांच्या विद्रुपीकरणाला यातून नक्कीच हातभार लागत आहे.       


हे सगळं अचानक मनात यायचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यावर लगेचच सर्वत्र त्यांच्या समर्थकांनी अभिनंदनाचे फलक लावले. मात्र मुख्यमंत्रांनी तत्काळ एक निवेदन प्रसिद्ध करून ते उतरवविण्यास सांगितले. सर्व फलक काढले गेले का नाहीत हा वेगळा मुद्दा आहे पण मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पहिला  निर्णय तरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे असा म्हणायला हरकत नाही. बघूया पुढे काय काय होते ते.

1 टिप्पणी:

  1. अरे ही होर्डिंग त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे...एखादी लाट येतेच अशी...थोड्या दिवसांनी हे ही वेड बहुतेक आपोआप कमी होईल... मस्त निरीक्षण!

    उत्तर द्याहटवा