रविवार, १९ डिसेंबर, २०१०

शिवतीर्थ रायगड आणि मी

बऱ्याच दिवसापासून जाईन जाईन म्हणत होतो, पण काही केल्या प्लानच ठरत नव्हता. आम्हा मित्रांच्या वेगवेगळ्या सुट्या, ऑफिस यातून अजिबातच जमत नव्हतं. पण अखेर आमचा प्लान ठरला आणि आम्ही 'रायगड' ला जायला सज्ज झालो. सर्व बुकिंग आणि ट्रेनची तिकिटे पण काढून झाली होती. 

मला आणि अभिषेक ला वेळेवर कुठे पोचायची लहानपणापासूनच सवय नाहीये, त्यामुळे इतक्या लवकर उठून, आवरून आम्हाला पुणे स्टेशन वर पोहोचायला थोडासा उशीरच (जवळपास फक्त पाऊण तास) झाला. स्टेशन बाहेर जयदीप आमची वाटच बघत होता. आम्ही दिसताच त्यांनी प्रचंड शिव्या द्यायला सुरवात केली, 'आरे हि काय वेळ झाली यायची... ६.१५ ठरलं होता ना काल...., गेली ट्रेन... आता बसा बोंबलत....'. (हा प्राणी कधीही वेळ चुकवत नाही त्याला आम्ही काय करणार?). मी त्याला समजावण्याच्या सुरात म्हणालो 'हा अभिषेक....तुला माहिती आहे ना त्याचं, नेहमीच उशीर करतो. (जयदीप ला पूर्ण माहित होतो कि आम्ही दोघेही नेहमी उशिरा येतो) पण तू tension घेवू नकोस,  ७.१५ ला पुढची ट्रेन आहे, आणि आपली तिकिटे चालतात त्याला, चला चहा घेवूया.....'
बरोबर ७.१५ ला पुणे- महाड (शिव प्रताप एक्स्प्रेस) आली आणि आमच्या प्रवासाला एका तासाच्या विलंबानी सुरवात झाली. रिझर्वेशन चा लफडा नसल्यानं ह्या गाडीत जिथे जागा मिळेल तिथे बसता येतं. सकाळच्या ११.१५ पर्यंत दर तासा- तासानी गाड्या आहेत, पुढे दीड दीड तासांनी. दोन तासाच्या नयनरम्य प्रवासात गाडी आपल्याला सह्याद्रीच्या कडेकपारीतून, हिरव्यागार निसर्गाच्या कुशीतून फिरवून महाड ला पोचवते. वाटेत फक्त तीन स्टेशन्स लागतात कात्रज, कापूरहोळ आणि नीरा. प्रवासात यथेच्च खादाडी करून आम्ही महाड रेल्वे स्टेशन वर उतरलो.          
   
महाड स्टेशन वरून बाहेर पडताच रायगड टुरिझमच तिकीट ऑफिस दिसतं ह्या ऑफिस मधून पुढील प्रवासासाठी तिकीट काढावी लागतात. जयदीप आमचा बुकिंग आणि बाकी arrangements  साठी मुख्य समन्वयक आहे, बऱ्याच वेळा तोच हे सगळं बघतो. नंतर आम्हाला कळलं कि पुढे गडापर्यंत जाण्यासाठी बस ची हि तिकिटे आहेत. तिकीट १०० रुपये आहे, महाड- रायगड जावून येवून प्रवास आणि गडावरचा प्रवेश यासाठी हे एकच तिकीट वापरता येतं. जयदीप नि आम्हाला अजून माहिती पुरवली कि पर्यावरण च्या रक्षणासाठी सरकारनी येथे private वाहनांना संपूर्ण बंदी घातली आहे. सर्वांना महाड- रायगड जाण्यासाठी   रायगड टुरिझमच्या बस चा वापर बंधन कारक आहे. ह्या मस्त ग्रीन-इको AC बस नि आम्हाला पुढचा २४ km चा प्रवास करायचा होता. साधारणता 25 मिनिटांमध्ये आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो. ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला अशा मराठी साम्राज्याचा राजधानीचे दर्शन आपण घेणार आहोत या केवळ भावनेनी माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.

वर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत एक रोपेवे आणि दुसरा पायऱ्या चढत, जवळपास १४५० पायऱ्या आहेत आणि ३ तास त्या तुमची सतत परीक्षा घेत असतात. तिघांचही वाढलेलं वजन आणि शारीरिक क्षमता  लक्षात  घेवून आम्ही रोपेवेनि जाण्याचा निर्णय घेतला. वर गेल्यावर राजदरबार, टकमक टोक, महाराजांची समाधी, याचबरोबर मुख्य आकर्षणं आहेत ती म्हणजे 'शिवराय राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय' आणि संध्याकाळी होणारा 'शिवराज्याभिषेकाचा' होणार ध्वनी-प्रकाश कार्यक्रम. ह्या दोन्हीसाठी एकचं तिकीट लागतं, रांगेमध्ये उभं राहायचा त्रास वाचवण्यासाठी आम्ही अगोदरच इंटरनेट वरून तिकीट बुक केली होती. वस्तुसंग्रहालयात त्याकाळातील वस्तू, चित्र, कलाकृती, दागिने यांचं प्रचंड जतन केलेला ठेवा आपल्या समोर तो काळच जणू जिवंत करतो. ह्याच बरोबर तलवारी, दांड्पत्ते, समशेर, तोफा- तोफगोळे, चिलखत हे देखील पाहायला मिळते. हा मराठी साम्राज्याचा वारसा अतिशय उत्तम रीतीने जपून ठेवणाऱ्या सरकारला आणि पुरातत्व खात्याला आपण मनापासून धन्यवाद देतो. ह्या सगळ्या बरोबरच अर्ध्यातासाची महाराजांचा जीवनपट उलगडणारी आणि माहिती देणारी फिल्म दाखवण्यात येते. ती खरच अवर्णनीय आहे.
अशाप्रकारे पूर्णपणे भारावलेल्या अवस्थेमध्ये आम्ही त्या मुझीयम मधून बाहेर आलो, त्यानंतर आम्ही  पुढील ठिकाणे पाहायला निघालो ह्यात महादरवाजा, हिरकणीचा बुरुज, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, टकमक टोक, बाजारपेठ इ. जागा पहिल्या. महारांच्या समाधी पुढे नतमस्तक झालो. अरे हो एक गोष्ट सांगायचीच राहिली आम्ही गडावर फिरताना ऑडियो सिस्टीम घेतली होती म्हणजे तुम्ही ज्या जागा पाहत आहात तिथला इतिहास आणि इतर माहिती तुम्हाला ऐकता येते. ह्याचा मुख्य फायदा म्हणजे साक्षात इतिहासच आपल्याला मी काय काय पाहिलं आहे ते सांगतो आहे असा भास होतो.  

आता शेवटचं आकर्षण होतं ते म्हणजे "शिवराज्य अभिषेक". बरोबर सायंकाळी ६.30 वाजता हा कार्यक्रम सुरु झाला, रायगड आमच्याशी बोलत होता आणि शिवराज्याभिषेकाच  पान आमच्या पुढे उलगडत होता. सुंदर प्रकाश योजना, बाबासाहेब पुरंदरे यांचा आवाज ह्या सगळ्यांनी वातावरण जिवंत केला होतं. ह्या सगळ्याला कुठलीही तोड नव्हती, वर्णन करायला शब्द नव्हते, फक्त मनात साठवलं जात होतं.
'जेष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तो शुभमंगल दिवस. हिंदू स्वराज्याचा सुवर्ण सौभाग्याचा क्षण उगवला. गागाभट्ट आणि इतर पंडितांनी उच्च स्वरात वेदमंत्र म्हणण्यास प्रारंभ केला, अन त्या प्रचंड वेदघोषात महाराज सिंहासनाला पदस्पर्शा होवू ना देता सिंहासनावर स्थानापन्न झाले. पूर्वेला सूर्योदयाची पूर्वचिन्हे उमटली होती. मंत्रघोष करीत असतानाच गागाभट्टानी मौल्यवान जडावाचे, मोतीलग झालरीचे छत्र उचलले. ते राजांच्या मस्तकावर धरले. मंत्रघोष संपला. क्षणभराची पण श्वास दडपून टाकणारी शांतता राजसभेवर पसरली. दुसऱ्या क्षणाला आसमंतात घोषणा दुमदुमली
                               "क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर गोब्राह्मणप्रतिपालक
                                            हिंदुपतs पातशहाs श्रीमंत श्री छत्रपती
                                            शिवाजी महाराज कि ........ जय ......"      
अद्भुत, अलौकिक, अवर्णनीय असा हा अनुभव होता.

अचानक "Mission Impossible" ची tune वाजू लागली, काहीच कळत नव्हतं काय आहे ते...पुन्हा तीच tune वाजली, ह्यावेळी मात्र कळलं कारण माझे डोळे उघडले, गजर वाजत होतां. 'च्यायला स्वप्न होतं हे'. मी तसाच काहीवेळ अंथरुणात बसून राहिलो. युरोपमध्ये फिरताना होणारं दु:ख, तळमळ, तगमग पार  स्वप्नापर्यंत जावून पोचली?  
तरीच सारखी शंका येत होती....हे असं नाहीये आणि मी याआधी सुद्धा गेलो आहे रायगड ला.
स्वप्न आणि सत्य ह्याची टोटल लावत मी ऑफिस ला जायची तयारी करू लागलो.

रविवार, १२ डिसेंबर, २०१०

त्याचं काय चुकलं?

गावाच्या स्मशानात भयाण शांतता पसरली होती, गावकऱ्यांची कुजबुज पेटत्या चितांच्या आवाजात विरून जात होती. स्मशानातल्या मूळच्या उदास आणि उजाड वातावरणात सायंकाळच्या संधीप्रकाशानी कुबटपणाचीही भर पडली होती. समोर पेटलेल्या चितांच्या धुरानी सारा आसमंत झाकोळून गेला होता.
भीमा निर्विकार चेहऱ्यानी बापाच्या पेटत्या चीतेकडे एकटक पाहत होता. मनात विचारांचं काहूर माजलं होतं, धाकटी बहिण, विधवा आईचा चेहेरा नजरे समोरून हलत नव्हता.

भीमा ला कसलीच जाणीव होत नव्हती, फिरून फिरून एकच विचार मनात येत होतं, बापाचं तरी काय चुकलं? आत्महत्या केल्यानी तो जगाच्या दृष्टीनी भ्याड, पळपुटा वगेरे ठरलाच असणार पण.....
आत्महत्या करणं, स्वत:ला संपवणं, आपल्या कुटुंबाची आपल्या पश्चात होणारी फरफट अटळ असताना हा निर्णय खरच किती दुख:दायक, किती क्लेशदायक असेल?
आयुष्यभर कधीही बापानी हिम्मत हरली नाही, काही वर्षांपूर्वी अस काही होईल हा विचारही माझ्याच काय पण गावाच्या कुणाच्याही मनात कधी फिरकला नसता. सत्य हे कल्पनेपेक्षा विचित्र आणि भयानक असत हेच खरं. शेती हेच आमच्या कुटुंबाचं उत्पन्न येणारं साधन होतं, भारतातील शेती हि शेतकर्यांच्या कष्टापेक्षा इतरच बाह्य परिस्थिती वर अवलंबून असते. अवेळी पडणारा अत्यंत बेभरवशी पाऊस, बियाणांची गुणवत्ता, कीड, खत अशा अनेक घटकांच्या हवाली शेतीचा उत्पन्न असतं. प्रत्येक शेतकरी हा जुगारीच असतो आणि तो हा जुगार दर वर्षी शेतकरी खेळतच असतो.
मागच्या तीन वर्षापासून सतत पडणारा दुष्काळ घराची रयाच घेवून गेला होता. केवळ रोजच्या जेवणासाठी दागिने, भांडी इतकाच काय गुरं देखील विकायची पाळी बापावर आली होती. पण यावर्षी अन्न देखील दुर्लभ होतं. जो अन्न पिकवतो त्याचीच मुलं उपाशी झोपायची. पण बापाची उमेद कायम होती, त्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडल्याने तो जरा खुश दिसत होता. पण पेरणी करायची तरी पैसा हवाच, जवळ दमडाहि नव्हता. शेवटी काळजावर दगड ठेवून घर गहाण टाकलं आणि माणिकशेट कडून २५०००   रुपये घेतले. पिक आल्यावर पैसे लगेच परत देता आलेच असते त्यामुळे मनावर तसं ओझं नव्हतं.
पहिला पाऊस पडून गेल्यावर बापानं सदयाकाकाची बैलजोडी आणून नांगरणी उरकून घेतली, पेरणी हि पार पडली. हळूहळू हिरवं रान दिसू लागलं होतं. आता फक्त काहीच दिवसांचा प्रश्न होता एकदा पिक आलं कि बरेचसे प्रश्न सुटणार होते. बक्कळ फायदा नाही पण कधीकधी हातात नुसते पैसे खेळत असले तरी बरीच कामं मार्गी लागतात. बाकी  काही नाही पण आमची शिक्षणही रखडली होती हे मात्र बापाला आत कुठे तरी खुपत होतं. सारखा म्हणायचं आता पिक गेलं कि सगळा व्यवस्थित होईल, तुमची शाळाही सुरु होईल.

सगळं व्यवस्थित चालू होता, पण त्यादिवशीची रात्र फारच विचित्र होती, त्यादिवशी संध्याकाळपासूनच आकाशात चारी बाजूनी ढग जमले होते, विजा चमकत होत्या, ढगांचा गडगडता आवाज काळजाचा ठोका चुकवत होता. रात्रभर पाऊस कोसळत होता कि वाटावा जणू ढगफुटीच झाली आहे. बापाचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही, रात्रभर येरझार्या घालत तो देवाला, नशिबाला शिव्या देत होता. उभ्या राहिलेल्या पिकावर असं आभाळ फाटल्यासारखा पाऊस म्हणजे संपूर्ण मेहनत, कष्ट, सगळं सगळं वाया. हा अवेळी पाऊस सतत चार दिवस पडत होता, सगळ्या शेतात पाणी भरलं, उभी पिकं आडवी झाली, बरीचशी सडली उरलेली काळी पडली. त्या उजाड शेताकडे पाहून बाप लहान मुलासारखा रडला, त्या दिवसा नंतर त्यांनी बोलणंच सोडलं, शेताकडे तासंतास बघत राहायचा, कुठे जायचा नाही यायचा नाही, झोपायचा नाही. परिस्थिती कधी कधी माणसाला अगदी माकड बनवते आणि त्याच्या माकड चाळ्यानची मजा पण पाहत बसते. काही दिवसापूर्वी ज्या पावसानी बापामध्ये उत्साह संचारला होता, उमेद जागवली होती त्याच पावसानी आज बाप पुरा कोसळून गेला होता.

आज सकाळी मायच्या किंचाळीन जाग आली, शेतात बाप पडला होता, बाजूला कीटकनाशकाची बाटली होती, त्या विषानी काळानिळा पडलेल्या त्याच्या चेहेर्याकडे पाहवत नव्हतं. खिशात चिट्ठी होती.

"मी हरलो, माझ्या नशिबापुढे! उभ्या आयुष्यात सुखाचे चार दिवस नाही देवू शकलो. पोरांचं शिक्षण थांबलं, मनी चा लग्न लांबलं. ह्याला मी जबाबदार आहे. हे शापित, दळभद्री आयुष्य मी संपवतो आहे. निदान तुमचं बाकी आयुष्यातरी सरकारनी दिलेल्या दीड लाख रुपयावर सुखी होईल"    
------------------------------------------------------------------------------------------------------

सध्या इतर भ्रष्टाचाराच्या गोंधळात टीव्ही आणि वर्तमानपत्रातून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या अतिशय गौण बनल्या आहेत. बऱ्याच लोकांच्या नजरेसही त्या पडत नसतील...पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे, ह्या दुर्दैवी घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. जो अन्न पिकवतो तोच इतका दुर्लक्षित राहिला तर पुढे काय?
कर्जमाफी फक्त बँकांमधून कर्ज घेतलेल्यांची झाली सावकार किंवा तत्सम कुणाकडून घेतलेल्यांची नाही. तुलनेनी अशा गावाच्या सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूपच जास्त आहे. हे असाच चालू राहिला तर खायचा अन्न देखील भारताला आयात करावं लागेल यात शंका नाही.

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०१०

राजकीय शुभेच्छा

सध्या महाराष्ट्रात अनेक युद्धे, शीतयुद्धे चालू आहेत. ठाकरे बंधूंचे मराठी युद्ध, मराठी-उत्तरभारतीयांचे युद्ध, भाजप-शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांचे आपापसात युद्ध, अशी अनेक युद्ध चालू आहेत. पण हि अर्थात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात चालू आहे. परंतु महाराष्ट्र भर जे एकमेव युद्ध चालू आहे ते म्हणजे "होल्डिंग युद्ध". महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा विविध राजकीय पक्षांची, राजकीय वरदहस्त असलेल्या संस्थांचे शुभेच्छा संदेश देणारे, अभिनंदनाचे, वाढदिवसांचे होल्डिंग दिसल्याशिवाय राहणार नाही. यात कुठलाही पक्ष पिछाडीवर नाहीये. शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस,रिपब्लिकन  यांच्या पुढाऱ्यांच्या फलकांच्या "फ्लेक्स"चे पेव फुटले आहे. या फलकांना फ्लेक्स म्हणतात हि मला नवीनच माहिती मिळाली. संगणक, डिजिटल प्रिंटींग मधील आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे फ्लेक्स फारच स्वस्तात आणि भव्य आकारामध्ये म्हणजे अगदी दोन-दोन मजले उंच देखील मिळू शकतात. 
या मोठमोठ्या फलकांमध्ये काहीही मजकूर असू शकतो "जीवेत शरद: शतम", भाऊंची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा, लालबागच्या राजाकडून सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत, जय शंभो प्रतिष्टान, A1 तोरन महोत्सव. सणांमध्ये या युद्धाला विशेष जोर येतो, दिवाळीच्या शुभेच्छा, ईद मुबारक, शिमग्याच्या शुभेच्छा अशा आणि अनेक. शुभेच्छुक म्हणून विविध राजकीय पक्षांचे होतकरू म्होरके असतात. शुभेच्छा संदेश कुठलाही असू दे त्या मध्ये त्या पक्षातील समस्त राजकारण्याचे फुल साईज पांढऱ्या स्वच्छ पोशाखातील फोटो मात्र असणारच.
उदाहरणासाठी असे समजा कि काँग्रेस पक्षातील बुरुम्बाड गावाचा एक नेता मा.श्री.सदाभाऊ सदावर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारा फलक आहे. फलक साधारण असा असेल, पार्श्वभूमीवर सोनिया गांधी, मनमोहन सिंग, राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण यांचे जुन्या पिक्चरच्या जाहिरातीत 'बॉर्डर' वगेरे मध्ये असतात तसे फोटो, पुढे एका वर्तुळात उत्सवमुर्तींचा फोटो, खाली मजकूर 
                                    "जीवेत शरद: शतम"             
मा.श्री.सदाभाऊ सदावर्ते उर्फ तात्या (सरपंच-बुरुम्बाड) यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा
 शुभेच्छुक- श्री.शरद गवई, श्री.राज, एकता मित्र मंडळ,अफजल, इस्माईल फ्रेंड सर्कल 
(याच्या खाली वर नावे असलेल्या सगळ्यांचे फोटो-अर्थात पांढऱ्या कपड्यात)


अशा प्रकारच्या मोठमोठ्या फलकांनी शहरातील सर्व रस्ते, चौक, आणि काही इमारतीही व्यापल्या गेल्या आहेत. आधीच शहरात सर्वत्र घाण आहेच त्यात या 'फ्लेक्स' नि जमीनीवरचा भागही घाण  करून टाकला आहे, साहजिकच शहरांच रूप अजूनच विद्रूप झालंय. पुण्यामध्ये या गणेशोत्सवामध्ये जवळपास प्रत्येक मंडळातर्फे गणेश भक्तांचे स्वागत करणारे फलक लावले होते त्यात मंडळाचे सर्व कार्यकर्ते फोटोसकट आपणास दिसले असते. आमच्या घरजवळच्या एका फलकामध्ये कार्यकर्त्यांचेच जवळपास २५-३० फोटो होते कि मूळ शुभेच्छा संदेशच काय पण गणपतीसुद्धा दिसत नव्हता. 
मध्यंतरी कॉर्पोरेशननी या प्रकारच्या फलकांवर शुल्क आकारलं होतं. अर्थात कुणीही हे शुल्क भरत नाही. कारण कायदे करणारे पण तेच आणि मोडणारे पण. तसं पाहिलं तर ह्या प्रकारच्या फलकांना काहीच अर्थ नाहीये, महाराष्ट्राच्या कुठल्यातरी कोपऱ्यात नवनिर्वाचित राजकीय पदाधिकाऱ्यांचा अभिनंदनपर होल्डिंग अथवा फलक लावून काय साध्य होणार आहे हे ते फलक लावणारेच जाणोत. एक गोष्ट मात्र नक्की कि शहरांच्या विद्रुपीकरणाला यातून नक्कीच हातभार लागत आहे.       


हे सगळं अचानक मनात यायचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाची शपत घेतल्यावर लगेचच सर्वत्र त्यांच्या समर्थकांनी अभिनंदनाचे फलक लावले. मात्र मुख्यमंत्रांनी तत्काळ एक निवेदन प्रसिद्ध करून ते उतरवविण्यास सांगितले. सर्व फलक काढले गेले का नाहीत हा वेगळा मुद्दा आहे पण मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पहिला  निर्णय तरी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आहे असा म्हणायला हरकत नाही. बघूया पुढे काय काय होते ते.

मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०१०

मला जगायचं होतं

रहस्य उलगडत नव्हतं, प्रश्नांनाही उत्तर नव्हतं
मी कोण कुठला हेच मला ठावूक नव्हतं,
पहिलं उद्दिष्ट हेच होतं, मलाच ओळखायचं होतं
जन्माआधीच सगळं संपलं, तरी मला जगायचं होतं

इच्छेचं पाखरू उडत होतं, सैरभैर फिरत होतं
मला खेळायचं होतं, मला शिकायचं होतं
प्रेमात पडायचं होतं, जग पाहायचं होतं
अपघाताचं निमित्त होतं, तरी मला जगायचं होतं

मला इंजिनियर, डॉक्टर, शास्त्रज्ञ व्हायचं होतं
मला अभिनेता व्हायचं होतं, मला नेता व्हायचं होतं
मला सचिन बनायचं होतं, मलामीर बनायचं होतं
काहीच होता गेलो तरी मला जगायचं होतं

शिक्षण, नोकरी, लग्न सारं काही रीतसर होतं
मुलांची प्रगती बघून अभिमानानं उर भरून येतं
कुटुंब-चक्रात आयुष्य अलगद निघून जातं
सारं काही झालं होतं, मनासारखं घडलं होतं,
वयहि खूप झालं होतं, मरणच फक्त उरलं होतं
तरी मला जगायचं होतं, तरी मला जगायचं होतं

मला हे करायचं होतं, मला ते करायचं होतं,
सगळं करायचं होतं, खूप काही करायचं होतं
अश्या विचारात सगळंच करायचं राहिलं होतं
काहीच केलं नाही तरी मला मात्र जगायचं होतं

प्राणपक्षी उडाला होता, स्वर्गाकडे निघाला होता
माझा मात्र प्रवासात हिशोब चालू होता
आयुष्यातील शून्य बघून गोंधळ उडाला होता
आता मात्र हे बदलण्याचा निर्धार पक्का होता

"सगळे हिशोब जुळतील, सगळी उत्तरं मिळतील
कितीही फिरलास तरी पुन्हा पुन्हा इथेच येशील"
कुणीतरी मला बोलावत होतं, काहीतरी सांगत होतं
मला काहीच कळत नव्हतं, मला पुन्हा जगायचं होतं

नेहमी हे असंच होतं, सालं नशीबच धोका देतं
तेच तेच दिसू लागतं, दुष्टचक्र मागे लागतं
त्यांनी काम केलं होतं, तुम्हाला बजावलं होतं
तेंव्हा तुला कळत नव्हतं, तुला तर जगायचं होतं


सोमवार, १६ ऑगस्ट, २०१०

'मनमोहना' तू राजा (स्वप्नातला).....

(राजकारण या अवघड विषयात शिरतो आहे. यावर भाष्य करायची माझी तशी योग्यता नाही पण कधी कधी बोलल्याशिवाय राहवत नाही.)

नुकताच देशभर ६४व्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १५ ऑगस्ट, रविवार ला सलग सातव्या वर्षी लाल किल्ल्यावर तिंरगा ध्वज फडकावला. पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी याच्या पश्चात प्रथमच इतका काळ पंतप्रधान पदावर राहणारे (टिकणारे) नेते म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी गौरव प्राप्त केला.

या प्रसंगी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी माजी पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी पाहिलेले 'विकसित भारताचे' स्वप्नं पूर्ण करू असे आश्वासन दिले.
'विकसित भारत' स्वातंत्र्याच्या ६३ वर्षांनी सुद्धा आपले पंतप्रधान भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचे स्वप्नं पूर्ण करण्याचे आश्वासन देतात इतकी हास्यास्पद गोष्ट कदाचित फक्त आपल्या देशातच होवू शकेल. आश्वासनाच बरं असतं आपण बांधील राहत नाही, नंतर सांगता येतं कि आपल्याकडे अनेक समस्या आहेत त्याकडे आधी लक्ष देवूयात मग पुढे...अजून एक आश्वासन. डॉ. मनमोहन सिंग सध्या गाजत असलेल्या आणि महत्वपूर्ण अशा सर्व मुदयांना आपल्या भाषणात स्पर्श करतात, यात कुठेही ठोस निर्णय/योजना कसलाही समावेश नाही, का कुठल्याही प्रश्नावर थेट उपाय नाही.
'विकसित भारत' हे गाढ झोपेतले हवं हवंस वाटणारं सुंदर स्वप्नं आहे पण नियतीला अशी स्वप्नाची दुनिया मान्य नसते, लगेच सकाळ होते आणि आपण वास्तवाच्या दुनियेत येवून पोचतो. अशीच काहीशी त्यांची सुद्धा भाषण करताना मनस्थिती झाली असेल.

'विकसित भारत'-कशी करणार हो याची व्याख्या? आर्थिक स्वायत्ता/सुबत्ता, ओद्योगिक प्रगती याबरोबरच संरक्षण, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रांमधेही पूर्ण स्वायत्त भारत. थोडक्यात भारताचा सर्वंकष विकास. सध्याची परिस्थिती लक्षात घेता दुर्दैवाने पुन्हा आपण स्वप्नाच्या दुनियेत जातो. इथे इमारतीचा पायाच नाहीये आणि कळस कसा असेल? किती उंच असेल? याची चर्चा कशाला? आधी 'पाया'च बांधकाम पूर्ण करा, मग ते पक्कं आणि भक्कम आहे का त्याची तपासणी करा मगच 'कळसाचे' संकल्प चित्र, रचना, त्यावरची सजावट याचा विचार करूया.
माझ्या या म्हणण्यामागची वास्तविकता पंतप्रधानांच्या भाषणात दिसून येते ते म्हणतात "सगळ्यांच्या अन्न, पाणी, आरोग्य, आदी प्रमुख गरजा भागवण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करील. अकराव्या पंचवार्षिक योजनेत शिक्षण आणि आरोग्य सेवा यांच्या विकासाला महत्त्व देण्यात येईल, तसेच पायाभूत सुविधांच्या विकासालाही सरकार महत्त्व देणार असल्याचे" ते म्हणाले. गेली ६३ वर्षे आपण याच गोष्टी पुरवण्यासाठी देशाची तिजोरी रिकामी करत आहोत, याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय संस्था पाण्यासारखा निधी उपलब्ध करून देत आहेत, तरीही आजची परिस्थिती जैसे थे आहे, फिरून फिरून परत त्याच ठिकाणी येत आहोत जणू एखाद्या दुष्टचक्रात अडकल्याप्रमाणे. याचमुळे मला पुन्हाएकदा म्हणावसं वाटतं कि आपल्याकडे सरकारतर्फे घेण्यात आलेल्या निर्णयांची, योजनाची वास्तविकता आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी हे तपासणारी यंत्रणाच नाहीये कि जेणे करून आपण सरकारची क्रियाशीलता तपासून बघू शकू.

नागरिकांच्या कृपेनी सलग १० वर्ष राज्य करायची संधी काँग्रेसला मिळाली आहे आणि या सत्तारूपी दुधात साखर म्हणजे यंदा काँग्रेसला जवळजवळ बहुमत मिळालं आहे. देशहिताचे अनेक निर्णय या बहुमतामुळे सरकार घेवू शकेल. मात्र इकडे वेगळीच परिस्थिती पाहायला मिळते. हे सरकार एखाद्या निद्रिस्त अजगराप्रमाणे प्रमाणे आपापल्या खुर्च्यांना आणि मतदारसंघांना वेढा घालून बसले आहेत, सत्तेच्या भक्षाने सध्या ज्याचे पोट पूर्ण भरलेलं आहे, नुकत्याच पगारात आणि भत्यांमध्ये झालेल्या भरघोस वाढीमुळे ढेकरही देवून झाला आहे आणि पुढील निवडणुकांपर्यंत अजून काही खाद्य शोधायची गरजही नाहीये. यामुळेच शक्यतो वादात पडायचे नाही, आलेले दिवस घालवत राहायचे, लढायचेच नाही म्हणजे संघर्षाचा प्रश्नच येत नाही अशी काहीशी भूमिका सध्या दिसून येत आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर महागाई, राष्ट्रकुल स्पर्धा, काश्मीरमधील हिंसाचार, माओवादी, दहशतवादी यांच्या देशविघातक कारवाया यावर कुठेही किरकोळ अपवाद सोडले तर पंतप्रधानांनी भाष्य करणे जरुरीचे समजले नाही. याच मुद्यांवरून संसदेच्या सत्रामध्ये प्रचंड गोंधळ झाला पण संसदेतील चर्चेतही डॉक्टरांनी हस्तक्षेप केला नाही. एकदाचे सत्र संपले म्हणजे झालं असा एकूण पवित्रा दिसतो.

आपल्या भाषणात पंतप्रधान डॉ. सिंग यांनी जम्मू-काश्मिर आणि ईशान्य भारतातील सगळ्या राजकीय पक्षांना तसेच सरकारविरोधी आंदोलने करणा-या गटांना चर्चेचे जाहीर आमंत्रण दिले. नक्षलवाद्यांना देखिल हिंसा सोडून चर्चेच्या टेबलावर येण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ते म्हणतात भारताला शेजारी देशांशी मैत्रीचे संबंध हवे आहेत. सीमेवर शांतता नांदावी, असे वाटत आहे. काही मतभेद असलेच तर ते चर्चेद्वारे सोडवायचे आहेत.
हे सगळे प्रश्न खरच चर्चेनी सुटणारे आहेत का? नुकत्याच पार पडलेल्या परराष्ट्रमंत्रांच्या चर्चेचे फलित काय होते? दोन्ही पक्षांनी एकमेकांवर (एकत्र पत्रकारांसमोर बसून) धूळफेक केली, आरोप-प्रत्यारोप झाले, हे कमी पडले म्हणून कि काय पुन्हा दोघांनी एकमेकांना चर्चेस बोलावले आणि झालं संपली चर्चा. 'चर्चा' या प्रकारच चांगलं आहे, लोकांना काहीतरी प्रयत्न चालू आहे असं वाटतं, पुन्हा चर्चेनंतर कोणी विचारत नाही कि काय निर्णय झाला. कालान्तरानी लोक विसरतात,प्रश्न जसाच्या तसा, त्यात काडीचा फरक नाही.

सध्याचे बाकी राजकारणी पहिले तर खरोखरच आपले भाग्य आहे कि आपल्याला पंतप्रधान म्हणून डॉ. सिंग यांसारखा उच्चशिक्षित अर्थतज्ञ मिळाला. मनात आणलं तर खरच आपलं परंपरागत स्वप्न "विकसित भारत" साकार होवू शकतं. मात्र सद्य परिस्थितीत डॉ. सिंग आपल्याच कुठल्यातरी स्वप्नात रंगलेले दिसतात (कदाचित शांततेचा नोबेल पुरस्कार?), पण मला हे सांगावसं हि सगळी स्वप्नाची दुनिया नाहीये (जिथे नोबेल सुद्धा जगातल्या सर्वात मोठं युद्ध पुकारणाऱ्यालाच मिळतं) , कि जिथे सगळे प्रश्न (उदा. दहशतवाद, नक्षलवाद ज्यात निष्पाप, सामान्य माणसं मारतानाही कुणी मागेपुढे पाहत नाही) फक्त चर्चेनी सोडवता येतील आणि चर्चा कुणाबरोबर तर ज्यांनी आजपर्यंत आपल्या बंधुभावांचे जीव घेतले त्याच्याबरोबर? हे कधीही न पटणारे आहे.

तात्पर्य मागची ६ वर्ष गेलेली असताना डॉक्टरांनी अजून प्रस्तावनाच न करता पुढील ४ वर्षे स्वप्नपूर्तीच्या दिशेने ठोस मार्गक्रमण करावे. भारतीयांचा विश्वास सार्थ ठरवून सध्या केवळ स्वप्नातच असणारा 'विकसित भारत' प्रत्यक्षात आणून सर्व जगाला दाखवून द्यावे कि हा स्वप्नातला राजा नसून स्वप्नं साकारणारा आहे.

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

॥ वन्दे मातरम ॥

बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८८२ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये 'वन्दे मातरम' हे गीत लिहिले होते. भारताच्या इतिहासात 'वन्दे मातरम' चे एक विशेष स्थान आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याच्या एकाच ध्येयांनी भारून गेलेल्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी 'वन्दे मातरम' हे प्रेरणागीत होते.
हि रचना बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८७६ ला केली होती, पण आनंदमठ या पुस्तकातून 'वन्दे मातरम' पहिल्यांदा प्रकाशित झालं.

वन्दे मातरम स्वातंत्र्य संग्रामातील मुख्य ब्रीद होते, ज्याच्या केवळ उच्चारानी स्वातंत्र्याची भावना अधिक तीव्र होत असे. अनेक मोर्चे, प्रभात फेऱ्या यातून हे गीत गायले जावू लागले. लोकांमध्ये 'वन्दे मातरम' चा इतका प्रभाव होता कि इंग्रजांनी दूरगामी धोका लक्षात घेवून 'वन्दे मातरम' च्या सार्वजनिक घोषणेवर काहीकाळ बंदी आणली होती.

या गीतावरून ते लिहिल्यापासून ते अगदी २००६ पर्यंत अनेक वेळा वाद झाले. स्वातंत्र्यपूर्वीपासून ते अगदी आजपर्यंत आपल्या राजकारण्यांनी आपल्या संकुचित फायद्यासाठी आणि मतांच्या राजकारणासाठी अनेक गोष्टींचे तुकडे केले, यात या प्रेरक गीताचे देखील तुकडे केले गेले.

भारत स्वतंत्र झाल्यावर भारतीय संविधानानी या 'वन्दे मातरम'च्या पहिल्या कडव्यास "राष्ट्रीयगान" असा दर्जा दिला आणि रवींद्रनाथ टागोर लिखित "जन गण मन" हे आपले राष्ट्रगीत झाले.

याच्या स्मरणार्थ आणि येणाऱ्या ६३व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानी संपूर्ण 'वन्दे मातरम' याठिकाणी प्रदर्शित करतो आहे.

वन्दे मातरम्

सुजलां सुफलां मलयजशीतलाम्
शस्यशामलां मातरम् ।
शुभ्रज्योत्स्नापुलकितयामिनीं
फुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं
सुहासिनीं सुमधुर भाषिणीं
सुखदां वरदां मातरम् ।। १ ।। वन्दे मातरम् ।

कोटि-कोटि-कण्ठ-कल-कल-निनाद-कराले
कोटि-कोटि-भुजैर्धृत-खरकरवाले,
अबला केन मा एत बले ।
बहुबलधारिणीं नमामि तारिणीं
रिपुदलवारिणीं मातरम् ।। २ ।। वन्दे मातरम् ।

तुमि विद्या, तुमि धर्म
तुमि हृदि, तुमि मर्म
त्वं हि प्राणा: शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारई प्रतिमा गडि
मन्दिरे-मन्दिरे मातरम् ।। ३ ।। वन्दे मातरम् ।

त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी
कमला कमलदलविहारिणी
वाणी विद्यादायिनी, नमामि त्वाम्
नमामि कमलां अमलां अतुलां
सुजलां सुफलां मातरम् ।। ४ ।। वन्दे मातरम् ।

श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां
धरणीं भरणीं मातरम् ।। ५ ।। वन्दे मातरम् ।।

रविवार, ८ ऑगस्ट, २०१०

"आंधळा राजा आणि मूर्ख प्रजा"

माझा आणि सरकारी कचेऱ्यांचा संबंध जरा कमीच आहे. तसा अजिबातच नाहीये. असं म्हणा ना कि मी तिकडे जाणं टाळतो. पण मध्यंतरी "Power of Attorney" साठी माझ्या दुर्दैवानं तिकडे जाण्याच्या योग आला. बरेच वेळा या ठिकाणी तुमचा सोबती एखादा वकील किंवा एजंट असतो.

आदल्या दिवशी मी वकिलाला भेटून कागद पत्रांची पूर्तता केली होतीच. "उद्या सकाळी ९ वाजता या घरी मग इथूनच निघू आपण हवेलीला" वकील साहेब. 'हवेली'? या प्रकारच्या सरकारी कचेरीला 'हवेली' म्हणतात हे मला पहिल्यांदाच कळलं. अश्या बऱ्याच 'हवेली' आहेत हे सुद्धा कळलं. आम्हाला आंबेगाव च्या हवेलीला भेट द्यायची होती.

दुसऱ्या दिवशी बरोबर ९ वाजता मी आणि माझा भाऊ वकिलाच्या घरी पोचलो आणि तिथून आम्ही हवेली कडे मोर्चा वळवला. वकिलांनी आधीच कुणाला तरी मोबाईल वरून नंबर लावायला सांगितला होता.(निंदेच्या सोयीसाठी त्याला आपण राजू म्हणूया). ह्या वकिलांचे अशा सरकारी हवेलीमध्ये म्हणा किंवा कचेरीमध्ये म्हणा या राजुसारखे कुणी ना कुणीतरी नेमलेले असते. त्या लोकांना कार्यालयाच्या पद्धतीची, आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण माहिती असते. इतकेच काय तिथे काम करणाऱ्यांची सुद्धा इत्यंभूत माहिती असते आणि विशेष म्हणजे हे लोक बिनदिक्कत पणे आतील "प्रवेश बंद" ठिकाणी फिरताना दिसतात. हे लोक कमिशन एजंट असतात, पण यात आपला फायदा असा कि सकाळी सकाळी जावून नंबर लावायला नको आणि एकदा नंबर लावला कि आपला काम लवकर होतं. (आपलं काम लवकर होतं हा माझा भ्रम होता हे लवकरच मला कळलं)

शेवटी आम्ही एकदाचे त्या 'हवेली'ला पोचलो. त्या कचेरीचं नावच फक्त 'हवेली' होतं बाकी 'हवेली' (टीव्ही वरच्या मालिका सिनेमा यात दिसणाऱ्या) आणि त्या जागेचा काहीही संबंध नव्हता. इथे 'हवेली' म्हणजे सिमेंट चे पत्रे असलेली झोपडीवजा खोली होती. बाहेर फक्त कामाचे आकारले जाणारे पैसे लिहिले होते. कुठेही कामाची पद्धत, आवश्यक कागदपत्र, फोर्म भरण्या संदर्भात माहिती नव्हती. थोडक्यात राजू एजंट हाच आमच्या आणि सरकारी कामकाजातील सर्वज्ञात दुवा होता. त्या अंधाऱ्या खोलीमध्ये फारच कुबट वातावरण होतं (कुबटच म्हणतात ना हो त्याला कि जिथे गेल्यावर एकदम नकोसं होतं बाहेर पडावस वाटत), आतमध्ये बऱ्याच लोकांची गर्दी होती, कुणीतरी लोकांच्या नावाने बोलावत होते (बोलावणारे लोक बहुदा एजंट असावेत). टेबलामागे बरीच लोक बसलेली होती, त्यापैकी काही लोक काहीच काम करत नव्हते असं मला प्रथमदर्शनी वाटलं (हा माझा अजून एक गैरसमज होता). नंतर नीट पाहिल्यावर कळला की ती लोकं फारच 'महत्वाची'? कामं करत होती. त्यापैकी एक जण फक्त कसले तरी शिक्के मारत होता, एक महिला आलेले फोर्म अनुक्रमानी लावत होती (हा क्रम तीच इतर एजंट बरोबर काहीतरी बोलून लावत होती). या सगळ्या प्रकारात कुठेही ज्यांचं काम आहे त्यातल्या कुणाचाही संबंध नव्हता. सगळा कारभार फारच गोंधळात टाकणारा आणि कुठल्याही पद्धतीत न बसणारा होता. (भ्रष्टाचाराचा उल्लेख मी जाणून बुजून या ठिकाणी टाळला आहे पण त्याचं अस्तित्व आहेच हे गृहीत धरावं).

ह्या सगळ्या गोंधळातून, त्यांच्या जेवायच्या, चहापाण्याच्या आणि इतर विश्रांतीतून आमचे काम संध्याकाळी ६.३० वा. पार पडले आणि ते पॉवर ऑफ अतोर्नी चे कागद माझ्या हातात आले. तसा पहिला तर हा दोन नागरीकांमाधला वैयक्तिक करार आहे आणि तो सरकारी अधिकार्यांसमोर रजिस्टर केला जातो. सध्या आधुनिक तंत्रज्ञान, संगणक याचा वापर होवूनही या कामांसाठी लागणारा वेळ आणि पैसा काही कमी होताना दिसत नाही. सरकारी कर्मचारी 'आपलं घरच काम थोडीच आहे' या भावनेनी कामं करीत राहतात आणि सामान्य नागरिक काही विचार न करता जे चालू आहे त्याचा अनुकरण करतात........

(या अनुभवामुळे मात्र मध्यंतरी वाचलेली सुधा मूर्तींची एक गोष्ट सारखी डोक्यात यायला लागली.)

एका गावात मनुकुमार नावाचा राजा असतो. राजा तसा फार हुशार मात्र आळस, विलासी वृत्ती, आणि भरपूर अहंभाव यामुळे त्याचे राज्यकारभारात अजिबात लक्ष नसते. त्याच्या राज्यात सगळा कारभार हा भ्रष्ट आणि मुजोर मंत्र्यांच्या हातात असतो. अर्थातच भ्रष्टाचार, लबाडी, दहशतीची राज्यात कुठेही कमतरता नसते. या गावात एक नरहरी नावाचा हुशार आणि सरळ मार्गी चालणारा माणूस असतो. याचमुळे त्याच्याकडे कुठलाही काम नसतं.

एक दिवस तो शक्कल लढवतो आणि एका सरकारी कार्यालासमोर दरवाज्यात एक शिक्का घेवून बसतो. कार्यालयाबाहेर बरीच मोठी रांग असते त्यातील पहिल्या माणसाच्या अर्जावर शिक्का मारतो. मग सगळेच लोक शिक्का मारून घेतात, काही जण तर त्याला पैसे सुद्धा देतात. कोणीही विचार करत नाही कि कसला शिक्का आहे त्यावर काय आहे? यथावकाश तो शिक्का कामकाजाचा एक भाग होतो आणि सर्व लोक त्याला शिक्का मारल्यावर पैसे देवू लागतात. नरहरीची युक्ती बरोबर लागू पडते, नरहरी चा संसार कसल्याही विवंचने वाचून सुरु होतो, गाठीला पैसे आणि काम दोन्हीही आलेले असते.
कालांतराने तो शिक्का इतका महत्वाचा होतो कि एखादा दिवस नरहरी आजारी पडला तर कार्यालयाचा कामकाज थांबतं. कर्मचारी सुद्धा अर्ज शिक्का नाही म्हणून परत पाठवत.

एक दिवस राजदरबारातील कुणाचंतरी काम असतं आणि नेमका त्यादिवशी नरहरी आजारी असतो. अर्थातच शिक्का नाही त्यामुळे त्या माणसाचा काम होत नाही. तो राजाकडे हि बातमी पोचवतो कि "शिक्का नसल्यामुळे अर्ज स्वीकारला गेला नाही आणि काम होवू शकलं नाही". राजाही कळेना कि हा कुठल्या शिक्क्याबद्दल सांगत आहे? राजा ह्या प्रकारची चौकशी करायची आज्ञा देतो, सेवक चौकशीअंती नरहरीला दरबारात हजर करतात. नरहरी आपली बाजू मांडतो कि त्यांनी कुणालाही बळजबरी केली नाही, तो फक्त तिथे शिक्का मारायचा पण नंतर लोकच आवर्जून शिक्का घेवू लागले आणि पैसे देवू लागले.

राजानी विचारलं कि शिक्क्यावर काय लिहिला आहे? नरहरीने घाबरत घाबरत शिक्का दाखवला त्यावर वेड्यावाकड्या अक्षरात लिहिला होतं "आंधळा राजा आणि मूर्ख प्रजा".
राजाला क्षणात आपली चूक कळाली, आपले कारभारात लक्ष नाही हे उमगलं. राजानी हे सगळं बदलायचा निर्णय घेतला. पुढे तो एक यशस्वी राजा म्हणून प्रसिद्ध झाला. नरहरीला दरबारात नोकरी दिली, तो शिक्का मात्र तसाच वापरला जावू लागला पण त्याचं उपयोग राजानी करवसुलीसाठी केला. शिक्का फक्त बदललेला होता "सुज्ञ राजा मनुकुमार: प्रजा कल्याणार्थ कर"!

वरील कथा अतिशय मार्मिक आहे आणि सध्याच्या आपल्या राज्यकर्त्यांच्या कारभाराशी खूपच मिळती जुळती आहे. देशात पैश्याची कमतरता आहे असं आपण देवस्थानात येणारा निधी, चित्रपटांच वाढणारं बजेट, IPL चा बाजार याकडे बघून अजिबातच म्हणू शकत नाही. जनतेसाठी सुरु केलेल्या योजना वास्तवात त्यांच्या पर्यंत पोहोचतात का नाही हे पाहणारी यंत्रणाच आपल्या इथे नाही.
यासारख्या अनेक कारणांमुळे आणि अंध राज्यकर्त्यांमुळे सध्या भ्रष्टाचार, महागाई, रोगराई याचा मुक्त संचार दिसतो आहे. शेतकरी आत्महत्या करतात, गरीब अजून गरीब होत आहेत, मंत्री अजून श्रीमंत होत आहेत. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण सुद्धा हे सगळं फारसा काही विरोध न करता सहन करत आहोत, जणू काही हेच आपला दैव आहे.


थोडक्यात काय तर "आंधळा राजा आणि मूर्ख प्रजा"