लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
लेख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २३ जून, २०११

सत्ता समीकरण

महाराज: प्रधानजी........... कुठे होतात तुम्ही ? कधी पासून आम्ही आपला इंतजार करत होतो.....आज ११ वाजले तरी आपला दरबारात पत्ता नाही....काय चालू काय आहे या राज्यात?
प्रधानजी: महाराज!! (लवून मुजरा करतो)....माफी असावी........पण महाराज काय एक एक exciting घडामोडी चालू आहेत राज्यात आणि तुम्ही काय इथे दरबारात लोकांची वाट बघत बसलात? थोडा वेळ TV पहा मजेत वेळ निघून जाईल.
महाराज: काय ते उपोषण, सत्याग्रह वगॅरेंबद्दल म्हणत असाल तर सध्या तिकडे लक्ष द्यायची आम्हाला गरज वाटत नाहिये. आमचं कुशल मंत्रीमंडळ आणि कुट्नीती department त्यांची चोख व्यवस्था लावतीलच यात आम्हांला शंका नाही.
प्रधानजी: ते ठीक आहे आहे पण या घोटाळ्यांचं काय? या भ्रष्टाचारावर काय उपाय आहे आपल्याकडे? या प्रश्नावर प्रजा फारच भडकलेली आहे.
महाराज: काय बोलता काय प्रधानजी, तुम्ही काय काल आले का राजकारणात? तुम्हाला माहित आहेच आम्ही एका समितीची स्थापना केली आहे. तिचा अहवाल येइल तेव्हा येवुदे.. आणि दोषींवर कठोर करवाई करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत असं निवेदन सगळीकडे छापुन आलं आहेच. काही चिंता नको.निवड्णुकांना तसा बराच वेळ आहे, जनता तशीही विसराळु आहे.
प्रधानजी: मग आपण एखादं निवेदन प्रकाशित करा किंवा पत्रकार परिषद?
महाराज: प्रधानजी काय वेडे कि काय तुम्ही? सध्या शांत रहाणे चांगलं. तुम्ही आमचा परदेश दौरा आयोजित करा...सगळं सुरळीत होईल निवडणुकीपर्यंत.

प्रधानजी तुम्ही सकाळी सकाळी या काय क्षुल्लक विषयात अडकलात? इथे मी वेगळ्याच चिंतेत होतो. उद्या युवराजांचा बारावीचा निकाल लागेल. आमचं हे रत्न म्हण्जे आनंदच आहे....मुश्कीलीने ५०% तक्के मिळाले तरी खुप झाले.
प्रधानजी: यात चिंता करण्यासारखं काय आहे?
महाराज: महाराणींना त्याला Engineer बनवायचे मनात आहे. problem झाला आहे तो त्या CET मुळे, CET मधे हा किती टक्के मिळवणार? आणि कसा Engineer बनणार?
प्रधानजी: महाराज,आपली काळजी व्यर्थ आहे....आपल्या मंत्र्यांपैकी अनेकांची मोठी मोठी इंजिनीरिंग colleges
सगळीकडे पसरली आहेत. CET वगेरे सगळं झूट आहे, तुम्ही फक्त नाव सांगा महाराज....युवराजाना तिकडे admission
मिळालीच म्हणून समजा.. नाहीतरी management seats भरणार तरी कश्या...? आणि आपले मंत्री तुमचं काम करणार नाहीत काय? तात्पर्य काळजी सोडा....
महाराज: आरे सांगता काय प्रधानजी...म्हणजे चिंताच मिटली. बघा सगळे प्रश्न कसे हळूहळू सुटत आहेत....आता हेच पहा ना उपोषणे, भ्रष्टाचार इतकाच काय आमचेच अनेक मंत्री जेल मध्ये आहेत. आमचे काही नुकसान?
प्रधानजी: नुकसान नाही असं कसं म्हणता ?
महाराज: परवाच ४ राज्यांच्या निवडणुका झाल्या...त्याच्या निकालावरून तरी आमचं काही नुकसान झाल्याचं आम्हाला तरी दिसत नाहीये.
सत्ता टिकणे महत्वाचे...दर ५ वर्षांनी निवडणुका येतात...पहिली २ वर्ष अशीच जातात...मधल्या २ वर्षात काही तरी केल्याचे दाखवायचे...आणि शेवटच्या पाचव्या वर्षात पुढच्या निवडणुकीची धोरणे आणि जनकल्याण याद्वारे काहीतरी केल्याचा आव आणायचा!! पहिल्या ३ वर्षांचे जनतेच्या काही लक्षात नसते... शेवटच्या २ वर्षात आम्ही काहीही वाईट न होण्याची खबरदारी घेतो..पुढच्या निवडणुकीत सत्ता पक्की असं समीकरणच आहे.. आणि मौनाचे पालन महत्वाचे
मौनात फार शक्ती आहे असं म्हणतात त्याचा प्रत्यय येतो आहे.

मौनं सर्वार्थ साधनं!!

प्रधानजी: वा वा क्या बात कहि है? आनंद आहे.....
महाराज कि जय!!! मुजरा.......

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०११

श्रद्धेची दुकाने- १

सध्या माझा फार गोंधळ उडालेला आहे. हे सोन्याच्या सिंहासनात बसलेले साईबाबा, सोन्याचे पितांबर, माणिक मोत्यांनी मढ़वलेला मुकुट घालून बसलेले श्रीमंत दगडूशेट गणपती (देवही श्रीमंत, गरीब असे विभागले गेले आहेत), कोट्यावधीची संपत्ति असणारे तिरुपतिचे बालाजी...हे सगळे बघून हा गोंधळ अजुनच वाढत आहे.  अरे बापरे.... हे काय चालू आहे? सध्या देवाची भक्ति करणे म्हणजे नुसत नमस्कार करून, स्तोत्र म्हणून होत नाही तर जास्तीत जास्त पैसे, सोनं, चांदी, दक्षिणा दिलीत तर तुम्ही खरे भक्त. त्या देवस्थानांचे ट्रस्टी देखिल ह्या संपत्तीसंचयात बुडालेले दिसतात.
हे इथेच थांबत नाही तर ह्याच बरोबर अनेक बुआ, बाबा, महाराज, योगी, सतगुरु हे तर इतके झाले आहेत की त्यांची अजिबातच गणना नाही. जागोजागी ह्यांची प्रवचने चाललेली आपण पहात असालच.ह्या प्रवचनांना सत्संग म्हणतात. मी मधे ऐकले होते कि कुणाच्या तरी सत्संगाच्या शेवटच्या दिवशी महाराजांचा प्रसाद घेण्यासाठी प्रचंड गर्दी होते. प्रसाद म्हणजे काय तर अग्नीशमन दलाचे बंब मागवतात आणि त्यातुन रंगीत पाणी हे महाराज भक्त जनांवर पाइप ने उडवतात. ह्यात भक्त गण धुंद होवुन भिजत असतात, मग काय कधी कधी यात धक्काबुक्की होते, चेंगरा-चेंगरी होते, क्वचित प्रसंगी चोरीचे प्रसंग हि उद्भवतात.

पण या उदंड देव आणि महाराजामुळेच आपणासारख्या गरिब भक्तांना मोठा चॉइस मिळत आहे, मग कही लोक गणपतीचे निस्सीम भक्त; काहीही चांगलं झालं की निघाले सारसबागेत (किंवा दगडूशेट ला), हाच गणपतीचा भक्त मुंबईत असेल तर फक्त सिद्धिविनायक बाकी कुठलाही गणपती नाही, काही लोक शंकराचे, काही देवीचे, काही इतर कुणाचे, याच बरोबर काही महाराज आणि गुरुंना मानणारे देखिल आहेत. स्वत:ला प्रचंड मॉडर्न वगेरे समजणारे, देव वगेरे झूठ, अंधश्रद्धा अशा बाता मारणारे माझे काही मित्र साडेसाती आली की शनीच्या मंदिरात तेल आणि माळ घेवुन लाइन लावलेले दिसतात, आता ह्याल काय म्हणायचे? (तसा मॉडर्न आणि देवळात जाण्या न जाण्याचा काहीही संबंध नाहीये, माझं म्हणणं इतकच कि उगाच का मग बाता मारायच्या?)

साधारणतः भक्ति किंवा धार्मिक भावना अनुवांशिक असते. म्हणजे घरातील आई वडिल कुणा देवाला मानत असतील तर आपोआपचे ते गुण पुढील पीढित उतरतात. मुलही पुढे त्या महाराजांची पूजा-अर्चा करू लागतात. कधी कधी आयुष्यात येणारया संकटांना तोंड देता देता आपल्या आराध्य देवते वरील श्रद्धा म्हणूया किंवा विश्वास याचा क्षय होवू शकतो. पण यातच कुणी हितचिंतक अजुन एका बाबांचे नाव सुचवतो, 'त्यांच्या कड़े जा सगळे प्रश्न सुटतील सगळी संकट दूर होतील.' बाबांच्या नशिबानी त्या माणसाच्या सगळ्या चिंता दूर होतात, त्यादिवासपसून तो त्या बाबांचा निस्सीम भक्त कधी बनुन जातो हे त्यालाही कळत नाही.
आमच्या घरात लहानपणापासुनच तसा धार्मिक वातावरणात  मी वाढलो. दर गुरवारी, चतुर्थीला आरती यामुळे आरत्या, अथर्वशीर्ष हे अगदी तोंडपाठ. गणपतीत आरत्या म्हणताना, त्या नंतर चढ्या आवाजातील मंत्रपुष्पांजलि एका सूरत म्हणताना फार मजा यायची. घरी सोवळं ओवळं कडकपणे पाळलं जाई, असं सगळं असलं तरी आमच्या घरच्यांनी कधीही धार्मिकतेची सक्ती केली नाही, याबाबतीत संपुर्ण स्वातंत्र्य दिलं गेलं. कदाचित यामुळेच देवाबद्दल आणि धर्मासंबंधी अतिशय स्पष्ट मत बनण्यास मदत झाली.

मध्यंतरी आमच्या ऑफिस मधील एका ईटालीयन colleague नी हिंदू धर्माबद्दल माहिती विचारली, हिंदू धर्मात एक नाही दोन नाही तर तब्बल ३३ कोटी देव आहेत हे ऍकल्यावर तो अगदीच चकीत झाला, त्याचा चेहेरा पहाण्यासारखा झाला होता. मला तो विचारतो why? why? so mony gods? मला विचारतो तुमचं एका देवानी समाधान होत नाही का? 

खरंच चांगला प्रश्न आहे की का इतके सगळे देव?

अनेक पुर्वजांनी हे उत्तर आधीच देवुन ठेवलं आहे, त्यामुळे माझं उत्तर लगेच तयारंच होतं. यातील स्वामी विवेकानंदांचे उत्तर मला जास्त भावतंआणि योग्यही वाटतं.

'तुमचा समाज सामजिक द्रूष्ट्या विकसित झाला आहे प्रगत आहे, म्हणुनच सामजिक तत्वाबाबत समाजाला स्वातंत्र्य आहे, मोकळेपणा आहे, समाजाचे विचारही पुरोगामी आहेत. भारत याबाबत मागास असला तरी धार्मिक द्रुष्ट्या अतिशय प्रगत, विकसित आहे यात अजिबातच शंका नाहीये, कारण आपले आरध्य निवडी बद्दल कुठलीही सक्ती नाहीये, बंधनं नाहीयेत. तत्वतः सर्व देव एकच आहेत आणि त्यांची आराधना करणारे सर्व हिंदू आहेत. त्यामुळे दिसायला जरी ३३ कोटी देव असले तरी ते सर्व एकाच तत्वाची विविध रुपे आहेत.'
हि  माहीती ऐकून तो खरचं चकीत झाला, पुढे म्हणाला 'कि ह्या लॉजिक नी मी सुद्धा हिंदूच आहे, फक्त मी येशु ला मानतो, मी त्याचा भक्त आहे'

हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे वर नमुद केलेली सद्य परिस्थिती आणि आपली तत्वे ह्याची काहीच टोटल लागत नाहिये.  जागोजागी विखुरलेली भविकांची श्रद्धास्थाने हि श्रद्धेची दुकाने झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
धार्मिक द्रुष्ट्या पुरोगामी असलेले आपले पुरातन तत्वज्ञान, विचार ह्या श्रद्धेच्या दुकानांनी अगदीच कुचकामी केले आहेत. भक्ती जर वैयक्तिक दुर्बलतेच कारण होत असेल तर हिंदू धर्माचे जे अतिशय प्राचीन आणि अतिशय उदात्त असे जे तत्वज्ञान आहे त्याचे पुनर्जीवन करण्यासाठी तरुणांनी पुढील किमान ५० वर्षे तरी फक्त भारत भुमिलाच आपले देव मानण्याची गरज आहे

------------------------------------------------------------------------------------------------------

ह्या विषयावर लिहिण्यासारखं खुप आहे, यथावकाश याच विषयावर अजुन लिहिता यावं यासाठी '१' नी श्री-गणेशा केला आहे.           
                                    
      
                              

सोमवार, २४ जानेवारी, २०११

इंद्रदेवाची सत्ता धोक्यात??

टेन्शन....टेन्शन...टेन्शन....या टेन्शन मुळे आज देवाधीदेव इंद्रालाही निद्रादेवी प्रसन्न होत नव्हती, काही केल्या आज झोप काही येत नव्ह्ती. मधे जरा डोळा लागतोय न लागतोय तोच भूलोकीचे असूर मुलायम, लालु सिंहासन हलवत उखडुन टाकत आहेत यासारख्या भयानक स्वप्नांनी दचकुन जाग येत होती. ब्लड प्रेशरचा त्रासही पुन्हा सुरु झाल्यासारखं वाटत होतं. 'सालं आजकालच्या अमृतामध्येसुद्धा पूर्वीसारखा गुण राहिला नाहीये. मी तर सकाळ संध्याकाळ अर्ध्या ग्लास डोस घेतो...पण काही उपयोग नाही'.
सकाळला अजुन ४ तास बाकी आहेत आता ३ तास....या विचारात डोळ्याला डोळा लागला नाही. उद्याचा दिवसच असा होता, इंद्रदेव असला म्हणुन काय झालं? त्यालादेखिल कुणाला तरी रिपोर्ट करावंच लागतंच ना. तो राजा पण शेवटी बोलुनचालुन देव जनतेचा सेवकच ना? मागच्या आठवड्यात अचानक एका देवजनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान जगद्निर्माता ब्रह्मदेव आणि जगद्नियन्ता  विष्णूदेव यांच्या द्विसदस्यिय समितीने देवलोकाचे २०१० सालाच्या कारभाराचं ऑडिट करावं असा निर्णय जाहीर केला आणि दोन त्रुतीयांश बहुमत असलेल्या इंद्रदेवाच्या सत्तेला हादरा दिला होता. तरी बरं इंद्राच्या वकीलांनी ताबडतोप अर्ज करुन ऑडिटला एक आठवड्याची मुदतवाढ मागून घेतली, आणि येणारं संकट अंमळ पुढे गेलं. मागील  वर्ष देवलोकासाठी विलक्षण घडामोडींच आणि धकाधकीचं होतं, विरोधी पक्षांनी सर्व घटनांचा योग्य वापर करुन प्रत्येक दिवस ढकलणं मुश्कील करून ठेवलं होतं.

सगळ्याची सुरवात त्या "त्रिलोक क्रिडास्पर्धांनी" झाली, भूलोकीचे आणि पाताळातील अनेकजण या स्पर्धांच्या आयोजनासाठी उत्सुक असताना देवांनी याचं यजमान पद मिळवण्यासाठी सर्व मार्गांचा वापर करत विजयश्री खेचुन आणली आणि देवलोकाला २०१० च्या "त्रिलोक क्रिडास्पर्धांचे" यजमानपद मिळालं.
वित्तमंत्री कुबेरदेवाकडे खर्चाची जबाबदारी दिली आणि चित्रगुप्ता कडे हिशोबाची सुत्रे दिली, दोघेही आपापल्या क्षेत्रात अत्यंत अनुभवी, प्रवीण होते तसेच ते स्वच्छ प्रतिमेसाठी दोघेही प्रसिद्ध होते. यादोघांच्या निवडीमुळे मी निर्धास्त झालो होतो, यापेक्षा अजुन योग्य नियुक्ती त्रिलोकात कुणालाही करण शक्यचं नव्हतं याविचारानी मी स्वतःवरच खुष झालो होतो. सुरवातीला सगळं सुरळीत चालु होतं पण देवसमाचार, देवलोक २४ x ७ सगळ्या चॅनल्सनी एक एक करुन भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढायला सुरवात केली. इथेच हे सगळं थांबलं नाही तर भूलोक आणि पाताळातही याची चर्चा सुरु झाली. देवलोकाची बदनामी व्हायला सुरवात झाली. "हे विरोधक सुखाचे चार दिवस काही बघु देतील तर शप्पत.....नक्कीच त्यांच कारस्थान असणार" मलाही असंच वाटलं होतं, पण आमच्या देवांनी भ्रष्टाचारात चारा सम्राट लालु आणि कलमाडींनाही मागे टाकलं होतं. अस्तित्वात नसलेल्या कंपनींना कंत्राटं, नातलग, हितचिंतकांना कंत्राटं जमेल त्या मार्गांनी संबंधित देवांनी यथेच्य खावुन घेतलं होतं. 'वाढता वाढता वाढे भेदिले सुर्यमंडळा', बजेट वाढता वाढता इतकं वाढलं कि साक्षात कुबेराला कर्ज घ्यावं लागलं. मी तरी कुठे कुठे बघणार? सही करताना प्रत्येक कागद वाचणं शक्यचं नाही, नेमुन दिलेल्या जबाबदाऱ्या चोख, आणि इमानदारीने पार पाडायला नकोत का? आपलेच दात आणि आपलेच ओठ, कुणाला सांगायचं? चौकशीचे आदेश देवुन कसंबसं प्रकरण शांत केलं, स्पर्धा पार पडल्या......पण फार म्हणजे फार मनस्ताप झाला हो.. आणि बेअब्रु झाली ती निराळीच.

स्पर्धा पार पडल्यापडल्या मी तत्काळ संबधित सचिवांना निलंबित केलं, बाकी मंत्रांच्या चौकशीचे आदेश दिले. (बाकी देव शांत होतात हो अशी 'fast Action' घेतल्यामुळे, काय असतं भूलोकीचे मनुष्य प्राणी असोत वा देवलोकीचे देव प्राणी सगळ्या जनतेची स्मरण शक्ती कमीच..हे एक वरदान राजकारण्यांना मिळालेला आहेच. त्याचा योग्य वापर करणारेच या खुर्ची राजकारणात टिकतात.)
स्पर्धांच्या धावपळीमुळे इंद्राची तब्येत खालावली, हवापालटासाठी काही दिवस कैलास मानसरोवर यात्रेस गेलं. सुट्टी संपवून येईतो देवलोकात हलकल्लोळ माजला होता. सकाळचा पेपर हातात पडताच इंद्राचा ब्लड प्रेशरचा त्रास पुन्हा सुरु झाल्या सारखं झालं.

- महागाई गगनाला.....देवाधीदेवांच्या मंत्र्यांच्या साठेबाजीमुळे देव जनता त्रस्त.
- यमलोक-भूलोक Expressway च्या टोलनाक्याची यमदूतांकडून तोडफोड. प्रलंबित भरमसाठ टोल आणि खड्डेयुक्त रस्त्यांमुळे वाढणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर..
- अप्सरेला इंद्रदेवानी बक्षीस म्हणून दिलेल्या flat च्या चौकशीचे आदेश
- यमदेवावर वाढलेलं लोड                 
- क्रीडा घोटाळ्यांवर देवाधीदेवांना कारणे दाखवा नोटीस
- देवालोकाचे कामकाज ठप्प.... विरोधकांकडून इंद्रदेवाच्या राजीनाम्याची मागणी

आरे बाप रे बाप एक ना दोन सारा पेपरच घोटाळ्यांनी भरलेला. अति झाल्यावर काहीतरी ठोस पावलं उचलावीच लागतात ना? त्याचाच परिणाम म्हणजे हे ऑडीट आहे.        
 
पण पुढे काय झालं? इंद्राचा राज्य गेलं? त्यांनी राजीनामा दिला? भ्रष्ट मंत्रांवर कारवाई झाली? कोण कोण दोषी आढळले? कोणाला अटक झाली? महागाई कमी झाली का? टोल कमी आणि रस्त्यांचा दर्जा सुधारला का? मुदतपूर्व निवडणुका?

काळजी करू नका...अहो इतक्या लवकर असं काही होतं का? इंद्राचे शासन निर्विवाद मध्ये चालूच आहे.

दर महिन्याप्रमाणे इंद्रदेवाकडून खालील निवेदन नुकतंच प्रसिद्ध झालं आहे...
"सर्व तथा कथित भ्रष्ट मंत्रांची चौकशी चालू आहे.... कोणी दोषी आढळल्यास, दोषींवर कारवाई करण्यास हे सरकार वचनबद्ध आहे...महागाई हा चिंतेचा विषय आहे...सरकार त्यावर ठोस पावलं उचलत आहे..लवकरच त्याचे परिणाम दिसतील."