सोमवार, २४ जानेवारी, २०११

इंद्रदेवाची सत्ता धोक्यात??

टेन्शन....टेन्शन...टेन्शन....या टेन्शन मुळे आज देवाधीदेव इंद्रालाही निद्रादेवी प्रसन्न होत नव्हती, काही केल्या आज झोप काही येत नव्ह्ती. मधे जरा डोळा लागतोय न लागतोय तोच भूलोकीचे असूर मुलायम, लालु सिंहासन हलवत उखडुन टाकत आहेत यासारख्या भयानक स्वप्नांनी दचकुन जाग येत होती. ब्लड प्रेशरचा त्रासही पुन्हा सुरु झाल्यासारखं वाटत होतं. 'सालं आजकालच्या अमृतामध्येसुद्धा पूर्वीसारखा गुण राहिला नाहीये. मी तर सकाळ संध्याकाळ अर्ध्या ग्लास डोस घेतो...पण काही उपयोग नाही'.
सकाळला अजुन ४ तास बाकी आहेत आता ३ तास....या विचारात डोळ्याला डोळा लागला नाही. उद्याचा दिवसच असा होता, इंद्रदेव असला म्हणुन काय झालं? त्यालादेखिल कुणाला तरी रिपोर्ट करावंच लागतंच ना. तो राजा पण शेवटी बोलुनचालुन देव जनतेचा सेवकच ना? मागच्या आठवड्यात अचानक एका देवजनहित याचिकेच्या सुनावणी दरम्यान जगद्निर्माता ब्रह्मदेव आणि जगद्नियन्ता  विष्णूदेव यांच्या द्विसदस्यिय समितीने देवलोकाचे २०१० सालाच्या कारभाराचं ऑडिट करावं असा निर्णय जाहीर केला आणि दोन त्रुतीयांश बहुमत असलेल्या इंद्रदेवाच्या सत्तेला हादरा दिला होता. तरी बरं इंद्राच्या वकीलांनी ताबडतोप अर्ज करुन ऑडिटला एक आठवड्याची मुदतवाढ मागून घेतली, आणि येणारं संकट अंमळ पुढे गेलं. मागील  वर्ष देवलोकासाठी विलक्षण घडामोडींच आणि धकाधकीचं होतं, विरोधी पक्षांनी सर्व घटनांचा योग्य वापर करुन प्रत्येक दिवस ढकलणं मुश्कील करून ठेवलं होतं.

सगळ्याची सुरवात त्या "त्रिलोक क्रिडास्पर्धांनी" झाली, भूलोकीचे आणि पाताळातील अनेकजण या स्पर्धांच्या आयोजनासाठी उत्सुक असताना देवांनी याचं यजमान पद मिळवण्यासाठी सर्व मार्गांचा वापर करत विजयश्री खेचुन आणली आणि देवलोकाला २०१० च्या "त्रिलोक क्रिडास्पर्धांचे" यजमानपद मिळालं.
वित्तमंत्री कुबेरदेवाकडे खर्चाची जबाबदारी दिली आणि चित्रगुप्ता कडे हिशोबाची सुत्रे दिली, दोघेही आपापल्या क्षेत्रात अत्यंत अनुभवी, प्रवीण होते तसेच ते स्वच्छ प्रतिमेसाठी दोघेही प्रसिद्ध होते. यादोघांच्या निवडीमुळे मी निर्धास्त झालो होतो, यापेक्षा अजुन योग्य नियुक्ती त्रिलोकात कुणालाही करण शक्यचं नव्हतं याविचारानी मी स्वतःवरच खुष झालो होतो. सुरवातीला सगळं सुरळीत चालु होतं पण देवसमाचार, देवलोक २४ x ७ सगळ्या चॅनल्सनी एक एक करुन भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढायला सुरवात केली. इथेच हे सगळं थांबलं नाही तर भूलोक आणि पाताळातही याची चर्चा सुरु झाली. देवलोकाची बदनामी व्हायला सुरवात झाली. "हे विरोधक सुखाचे चार दिवस काही बघु देतील तर शप्पत.....नक्कीच त्यांच कारस्थान असणार" मलाही असंच वाटलं होतं, पण आमच्या देवांनी भ्रष्टाचारात चारा सम्राट लालु आणि कलमाडींनाही मागे टाकलं होतं. अस्तित्वात नसलेल्या कंपनींना कंत्राटं, नातलग, हितचिंतकांना कंत्राटं जमेल त्या मार्गांनी संबंधित देवांनी यथेच्य खावुन घेतलं होतं. 'वाढता वाढता वाढे भेदिले सुर्यमंडळा', बजेट वाढता वाढता इतकं वाढलं कि साक्षात कुबेराला कर्ज घ्यावं लागलं. मी तरी कुठे कुठे बघणार? सही करताना प्रत्येक कागद वाचणं शक्यचं नाही, नेमुन दिलेल्या जबाबदाऱ्या चोख, आणि इमानदारीने पार पाडायला नकोत का? आपलेच दात आणि आपलेच ओठ, कुणाला सांगायचं? चौकशीचे आदेश देवुन कसंबसं प्रकरण शांत केलं, स्पर्धा पार पडल्या......पण फार म्हणजे फार मनस्ताप झाला हो.. आणि बेअब्रु झाली ती निराळीच.

स्पर्धा पार पडल्यापडल्या मी तत्काळ संबधित सचिवांना निलंबित केलं, बाकी मंत्रांच्या चौकशीचे आदेश दिले. (बाकी देव शांत होतात हो अशी 'fast Action' घेतल्यामुळे, काय असतं भूलोकीचे मनुष्य प्राणी असोत वा देवलोकीचे देव प्राणी सगळ्या जनतेची स्मरण शक्ती कमीच..हे एक वरदान राजकारण्यांना मिळालेला आहेच. त्याचा योग्य वापर करणारेच या खुर्ची राजकारणात टिकतात.)
स्पर्धांच्या धावपळीमुळे इंद्राची तब्येत खालावली, हवापालटासाठी काही दिवस कैलास मानसरोवर यात्रेस गेलं. सुट्टी संपवून येईतो देवलोकात हलकल्लोळ माजला होता. सकाळचा पेपर हातात पडताच इंद्राचा ब्लड प्रेशरचा त्रास पुन्हा सुरु झाल्या सारखं झालं.

- महागाई गगनाला.....देवाधीदेवांच्या मंत्र्यांच्या साठेबाजीमुळे देव जनता त्रस्त.
- यमलोक-भूलोक Expressway च्या टोलनाक्याची यमदूतांकडून तोडफोड. प्रलंबित भरमसाठ टोल आणि खड्डेयुक्त रस्त्यांमुळे वाढणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर..
- अप्सरेला इंद्रदेवानी बक्षीस म्हणून दिलेल्या flat च्या चौकशीचे आदेश
- यमदेवावर वाढलेलं लोड                 
- क्रीडा घोटाळ्यांवर देवाधीदेवांना कारणे दाखवा नोटीस
- देवालोकाचे कामकाज ठप्प.... विरोधकांकडून इंद्रदेवाच्या राजीनाम्याची मागणी

आरे बाप रे बाप एक ना दोन सारा पेपरच घोटाळ्यांनी भरलेला. अति झाल्यावर काहीतरी ठोस पावलं उचलावीच लागतात ना? त्याचाच परिणाम म्हणजे हे ऑडीट आहे.        
 
पण पुढे काय झालं? इंद्राचा राज्य गेलं? त्यांनी राजीनामा दिला? भ्रष्ट मंत्रांवर कारवाई झाली? कोण कोण दोषी आढळले? कोणाला अटक झाली? महागाई कमी झाली का? टोल कमी आणि रस्त्यांचा दर्जा सुधारला का? मुदतपूर्व निवडणुका?

काळजी करू नका...अहो इतक्या लवकर असं काही होतं का? इंद्राचे शासन निर्विवाद मध्ये चालूच आहे.

दर महिन्याप्रमाणे इंद्रदेवाकडून खालील निवेदन नुकतंच प्रसिद्ध झालं आहे...
"सर्व तथा कथित भ्रष्ट मंत्रांची चौकशी चालू आहे.... कोणी दोषी आढळल्यास, दोषींवर कारवाई करण्यास हे सरकार वचनबद्ध आहे...महागाई हा चिंतेचा विषय आहे...सरकार त्यावर ठोस पावलं उचलत आहे..लवकरच त्याचे परिणाम दिसतील."

स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या निधना बद्दल काय लिहिणार? पुण्यात असल्याने त्यांच्या अंत्यादर्शनाला प्रत्यक्ष जावून नतमस्तक होता आलं हीच एक समाधानाची बाब.
पंत आणि पाठोपाठ भीमसेनजींच्या निधनानी कला क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

स्वरभास्कराचा अस्ताने शास्त्रीय गायन क्षेत्रात काळोखाच राज्य पसरलं आहे हे नक्की. त्यांनी रचलेल्या 'कलाश्री' रागानेच त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.

http://www.youtube.com/watch?v=9ViMk88PhTM

गुरुवार, १३ जानेवारी, २०११

पंत तुम्हाला मानाचा मुजरा

काही लोकोत्तर पुरुष कुठलाही वारसा नसताना एखाद्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वानी असं काही नावलौकिक मिळवतात कि त्यांचं नाव त्या क्षेत्रात अमर होवून जातं. पणशीकरांच्या संस्कृत, ज्योतिष आणि वेद्शास्त्राची दोन पिढ्यांची परंपरा लाभलेल्या घराण्यात १४ मार्च १९३१ प्रभाकराचा जन्म झाला. आजोबा पंडित वासुदेव शास्त्री पणशीकर, वडिल पंडित विष्णूशास्त्री पणशीकर यां दशग्रंथी पंडितांच्या तालमीत हा सुर्य वाढत होता. या कुटुंबालाच काय पण सगळ्या घराण्याला स्वप्नातही वाटलं नसतं की हा मुलगा पुढे मराठी रंगभूमीवरिल ५० वर्ष अनभिषिक्‍त सत्ता गाजवेल मोठा रंगकर्मी, नटश्रेष्ठ म्हणुन दैदिप्यमान यश मिळवेल,  रसिकांच्या मनात कायमची जागा मिळवेल.
१५ व्या वर्षी हौस म्हणुन शाळेच्या नाटकात केलेली सुरुवात, त्यातील भूमिके बद्दल मिळलेली दाद, वाहवा,  कौतुकच त्यांना रंगभूमीच्या अधिकाधिक जवळ घेवुन गेलं. रंगभूमी आणि त्यांचं घट्ट नातं बनून गेलं हि हौसच पुढे जगण्याचं ध्येय बनलं, ह्याच ध्येयापोटी घर सोडलं, रस्त्यावर दिवस काढले पण माघार कधीच घेतली नाही.
आचार्य  अत्रे लिखीत "तो मी नव्हेच" नाटकाची सुरुवात झाली त्यात प्रभाकर पणशीकरांनी एक नाही दोन नाही तर तब्बल पाच वेगवेगळ्या भूमिका साकार केल्या आणि महाराष्टातच नाही तर शेजारी राज्यातील रसिकांना देखील अक्षरशः वेड लावलं. या नाटकाचे हजारो प्रयोग झाले, फिरत्या रंगमंचाचा प्रथमच वापर करुन कल्पक बुद्धीची ओळख करुन दिली. आपल्या खणखणीत आवाज, स्पष्ट उच्चार, अभिनयकौशल्याच्या बळावर त्यांनी 'तो मी नव्हेच' मधला लखोबा लोखंडे, 'अश्रुंची झाली फुले' मधला प्राध्यापक विद्यानंद, 'इथे ओशाळला मृत्यू' मधला औरंगजेब हि पात्रे अजरामर केली. याच बरोबर ‘जस्टीस देवकीनंदन’, ‘चंदर’, ‘ग्लाडसाहेब’  या भूमिकांनाही रसिकांनी भरभरून दाद दिली
नाट्यसंपदा हि स्वतः ची संस्था उभारली, एकूण ४३ नाटकं त्यांनी रंगभूमीवर आणली त्यांचे हजारो प्रयोग केले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा पहिला ‘जीवन गौरव पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार असे १६ पुरस्कार त्यांना मिळाले.

या थोर अवलियाला आम्हा रसिकांकडून मानाचा मुजरा!
प्रभाकर पणशीकरांच्या निधनानी लखोबा लोखंडे आणि शेहेनशहा औरंगजेबही आज पोरका झाला.
पंत तुम्ही आपल्या  खणखणीत आवाजात फक्त "तो मी नव्हेच!" जरी म्हणाला असतात तरी तो काळही   माघारी फिरला असता.