रविवार, १९ डिसेंबर, २०१०

शिवतीर्थ रायगड आणि मी

बऱ्याच दिवसापासून जाईन जाईन म्हणत होतो, पण काही केल्या प्लानच ठरत नव्हता. आम्हा मित्रांच्या वेगवेगळ्या सुट्या, ऑफिस यातून अजिबातच जमत नव्हतं. पण अखेर आमचा प्लान ठरला आणि आम्ही 'रायगड' ला जायला सज्ज झालो. सर्व बुकिंग आणि ट्रेनची तिकिटे पण काढून झाली होती. 

मला आणि अभिषेक ला वेळेवर कुठे पोचायची लहानपणापासूनच सवय नाहीये, त्यामुळे इतक्या लवकर उठून, आवरून आम्हाला पुणे स्टेशन वर पोहोचायला थोडासा उशीरच (जवळपास फक्त पाऊण तास) झाला. स्टेशन बाहेर जयदीप आमची वाटच बघत होता. आम्ही दिसताच त्यांनी प्रचंड शिव्या द्यायला सुरवात केली, 'आरे हि काय वेळ झाली यायची... ६.१५ ठरलं होता ना काल...., गेली ट्रेन... आता बसा बोंबलत....'. (हा प्राणी कधीही वेळ चुकवत नाही त्याला आम्ही काय करणार?). मी त्याला समजावण्याच्या सुरात म्हणालो 'हा अभिषेक....तुला माहिती आहे ना त्याचं, नेहमीच उशीर करतो. (जयदीप ला पूर्ण माहित होतो कि आम्ही दोघेही नेहमी उशिरा येतो) पण तू tension घेवू नकोस,  ७.१५ ला पुढची ट्रेन आहे, आणि आपली तिकिटे चालतात त्याला, चला चहा घेवूया.....'
बरोबर ७.१५ ला पुणे- महाड (शिव प्रताप एक्स्प्रेस) आली आणि आमच्या प्रवासाला एका तासाच्या विलंबानी सुरवात झाली. रिझर्वेशन चा लफडा नसल्यानं ह्या गाडीत जिथे जागा मिळेल तिथे बसता येतं. सकाळच्या ११.१५ पर्यंत दर तासा- तासानी गाड्या आहेत, पुढे दीड दीड तासांनी. दोन तासाच्या नयनरम्य प्रवासात गाडी आपल्याला सह्याद्रीच्या कडेकपारीतून, हिरव्यागार निसर्गाच्या कुशीतून फिरवून महाड ला पोचवते. वाटेत फक्त तीन स्टेशन्स लागतात कात्रज, कापूरहोळ आणि नीरा. प्रवासात यथेच्च खादाडी करून आम्ही महाड रेल्वे स्टेशन वर उतरलो.          
   
महाड स्टेशन वरून बाहेर पडताच रायगड टुरिझमच तिकीट ऑफिस दिसतं ह्या ऑफिस मधून पुढील प्रवासासाठी तिकीट काढावी लागतात. जयदीप आमचा बुकिंग आणि बाकी arrangements  साठी मुख्य समन्वयक आहे, बऱ्याच वेळा तोच हे सगळं बघतो. नंतर आम्हाला कळलं कि पुढे गडापर्यंत जाण्यासाठी बस ची हि तिकिटे आहेत. तिकीट १०० रुपये आहे, महाड- रायगड जावून येवून प्रवास आणि गडावरचा प्रवेश यासाठी हे एकच तिकीट वापरता येतं. जयदीप नि आम्हाला अजून माहिती पुरवली कि पर्यावरण च्या रक्षणासाठी सरकारनी येथे private वाहनांना संपूर्ण बंदी घातली आहे. सर्वांना महाड- रायगड जाण्यासाठी   रायगड टुरिझमच्या बस चा वापर बंधन कारक आहे. ह्या मस्त ग्रीन-इको AC बस नि आम्हाला पुढचा २४ km चा प्रवास करायचा होता. साधारणता 25 मिनिटांमध्ये आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो. ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला अशा मराठी साम्राज्याचा राजधानीचे दर्शन आपण घेणार आहोत या केवळ भावनेनी माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.

वर जाण्यासाठी दोन पर्याय आहेत एक रोपेवे आणि दुसरा पायऱ्या चढत, जवळपास १४५० पायऱ्या आहेत आणि ३ तास त्या तुमची सतत परीक्षा घेत असतात. तिघांचही वाढलेलं वजन आणि शारीरिक क्षमता  लक्षात  घेवून आम्ही रोपेवेनि जाण्याचा निर्णय घेतला. वर गेल्यावर राजदरबार, टकमक टोक, महाराजांची समाधी, याचबरोबर मुख्य आकर्षणं आहेत ती म्हणजे 'शिवराय राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय' आणि संध्याकाळी होणारा 'शिवराज्याभिषेकाचा' होणार ध्वनी-प्रकाश कार्यक्रम. ह्या दोन्हीसाठी एकचं तिकीट लागतं, रांगेमध्ये उभं राहायचा त्रास वाचवण्यासाठी आम्ही अगोदरच इंटरनेट वरून तिकीट बुक केली होती. वस्तुसंग्रहालयात त्याकाळातील वस्तू, चित्र, कलाकृती, दागिने यांचं प्रचंड जतन केलेला ठेवा आपल्या समोर तो काळच जणू जिवंत करतो. ह्याच बरोबर तलवारी, दांड्पत्ते, समशेर, तोफा- तोफगोळे, चिलखत हे देखील पाहायला मिळते. हा मराठी साम्राज्याचा वारसा अतिशय उत्तम रीतीने जपून ठेवणाऱ्या सरकारला आणि पुरातत्व खात्याला आपण मनापासून धन्यवाद देतो. ह्या सगळ्या बरोबरच अर्ध्यातासाची महाराजांचा जीवनपट उलगडणारी आणि माहिती देणारी फिल्म दाखवण्यात येते. ती खरच अवर्णनीय आहे.
अशाप्रकारे पूर्णपणे भारावलेल्या अवस्थेमध्ये आम्ही त्या मुझीयम मधून बाहेर आलो, त्यानंतर आम्ही  पुढील ठिकाणे पाहायला निघालो ह्यात महादरवाजा, हिरकणीचा बुरुज, हत्ती तलाव, गंगासागर तलाव, टकमक टोक, बाजारपेठ इ. जागा पहिल्या. महारांच्या समाधी पुढे नतमस्तक झालो. अरे हो एक गोष्ट सांगायचीच राहिली आम्ही गडावर फिरताना ऑडियो सिस्टीम घेतली होती म्हणजे तुम्ही ज्या जागा पाहत आहात तिथला इतिहास आणि इतर माहिती तुम्हाला ऐकता येते. ह्याचा मुख्य फायदा म्हणजे साक्षात इतिहासच आपल्याला मी काय काय पाहिलं आहे ते सांगतो आहे असा भास होतो.  

आता शेवटचं आकर्षण होतं ते म्हणजे "शिवराज्य अभिषेक". बरोबर सायंकाळी ६.30 वाजता हा कार्यक्रम सुरु झाला, रायगड आमच्याशी बोलत होता आणि शिवराज्याभिषेकाच  पान आमच्या पुढे उलगडत होता. सुंदर प्रकाश योजना, बाबासाहेब पुरंदरे यांचा आवाज ह्या सगळ्यांनी वातावरण जिवंत केला होतं. ह्या सगळ्याला कुठलीही तोड नव्हती, वर्णन करायला शब्द नव्हते, फक्त मनात साठवलं जात होतं.
'जेष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तो शुभमंगल दिवस. हिंदू स्वराज्याचा सुवर्ण सौभाग्याचा क्षण उगवला. गागाभट्ट आणि इतर पंडितांनी उच्च स्वरात वेदमंत्र म्हणण्यास प्रारंभ केला, अन त्या प्रचंड वेदघोषात महाराज सिंहासनाला पदस्पर्शा होवू ना देता सिंहासनावर स्थानापन्न झाले. पूर्वेला सूर्योदयाची पूर्वचिन्हे उमटली होती. मंत्रघोष करीत असतानाच गागाभट्टानी मौल्यवान जडावाचे, मोतीलग झालरीचे छत्र उचलले. ते राजांच्या मस्तकावर धरले. मंत्रघोष संपला. क्षणभराची पण श्वास दडपून टाकणारी शांतता राजसभेवर पसरली. दुसऱ्या क्षणाला आसमंतात घोषणा दुमदुमली
                               "क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर गोब्राह्मणप्रतिपालक
                                            हिंदुपतs पातशहाs श्रीमंत श्री छत्रपती
                                            शिवाजी महाराज कि ........ जय ......"      
अद्भुत, अलौकिक, अवर्णनीय असा हा अनुभव होता.

अचानक "Mission Impossible" ची tune वाजू लागली, काहीच कळत नव्हतं काय आहे ते...पुन्हा तीच tune वाजली, ह्यावेळी मात्र कळलं कारण माझे डोळे उघडले, गजर वाजत होतां. 'च्यायला स्वप्न होतं हे'. मी तसाच काहीवेळ अंथरुणात बसून राहिलो. युरोपमध्ये फिरताना होणारं दु:ख, तळमळ, तगमग पार  स्वप्नापर्यंत जावून पोचली?  
तरीच सारखी शंका येत होती....हे असं नाहीये आणि मी याआधी सुद्धा गेलो आहे रायगड ला.
स्वप्न आणि सत्य ह्याची टोटल लावत मी ऑफिस ला जायची तयारी करू लागलो.

रविवार, १२ डिसेंबर, २०१०

त्याचं काय चुकलं?

गावाच्या स्मशानात भयाण शांतता पसरली होती, गावकऱ्यांची कुजबुज पेटत्या चितांच्या आवाजात विरून जात होती. स्मशानातल्या मूळच्या उदास आणि उजाड वातावरणात सायंकाळच्या संधीप्रकाशानी कुबटपणाचीही भर पडली होती. समोर पेटलेल्या चितांच्या धुरानी सारा आसमंत झाकोळून गेला होता.
भीमा निर्विकार चेहऱ्यानी बापाच्या पेटत्या चीतेकडे एकटक पाहत होता. मनात विचारांचं काहूर माजलं होतं, धाकटी बहिण, विधवा आईचा चेहेरा नजरे समोरून हलत नव्हता.

भीमा ला कसलीच जाणीव होत नव्हती, फिरून फिरून एकच विचार मनात येत होतं, बापाचं तरी काय चुकलं? आत्महत्या केल्यानी तो जगाच्या दृष्टीनी भ्याड, पळपुटा वगेरे ठरलाच असणार पण.....
आत्महत्या करणं, स्वत:ला संपवणं, आपल्या कुटुंबाची आपल्या पश्चात होणारी फरफट अटळ असताना हा निर्णय खरच किती दुख:दायक, किती क्लेशदायक असेल?
आयुष्यभर कधीही बापानी हिम्मत हरली नाही, काही वर्षांपूर्वी अस काही होईल हा विचारही माझ्याच काय पण गावाच्या कुणाच्याही मनात कधी फिरकला नसता. सत्य हे कल्पनेपेक्षा विचित्र आणि भयानक असत हेच खरं. शेती हेच आमच्या कुटुंबाचं उत्पन्न येणारं साधन होतं, भारतातील शेती हि शेतकर्यांच्या कष्टापेक्षा इतरच बाह्य परिस्थिती वर अवलंबून असते. अवेळी पडणारा अत्यंत बेभरवशी पाऊस, बियाणांची गुणवत्ता, कीड, खत अशा अनेक घटकांच्या हवाली शेतीचा उत्पन्न असतं. प्रत्येक शेतकरी हा जुगारीच असतो आणि तो हा जुगार दर वर्षी शेतकरी खेळतच असतो.
मागच्या तीन वर्षापासून सतत पडणारा दुष्काळ घराची रयाच घेवून गेला होता. केवळ रोजच्या जेवणासाठी दागिने, भांडी इतकाच काय गुरं देखील विकायची पाळी बापावर आली होती. पण यावर्षी अन्न देखील दुर्लभ होतं. जो अन्न पिकवतो त्याचीच मुलं उपाशी झोपायची. पण बापाची उमेद कायम होती, त्यात जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडल्याने तो जरा खुश दिसत होता. पण पेरणी करायची तरी पैसा हवाच, जवळ दमडाहि नव्हता. शेवटी काळजावर दगड ठेवून घर गहाण टाकलं आणि माणिकशेट कडून २५०००   रुपये घेतले. पिक आल्यावर पैसे लगेच परत देता आलेच असते त्यामुळे मनावर तसं ओझं नव्हतं.
पहिला पाऊस पडून गेल्यावर बापानं सदयाकाकाची बैलजोडी आणून नांगरणी उरकून घेतली, पेरणी हि पार पडली. हळूहळू हिरवं रान दिसू लागलं होतं. आता फक्त काहीच दिवसांचा प्रश्न होता एकदा पिक आलं कि बरेचसे प्रश्न सुटणार होते. बक्कळ फायदा नाही पण कधीकधी हातात नुसते पैसे खेळत असले तरी बरीच कामं मार्गी लागतात. बाकी  काही नाही पण आमची शिक्षणही रखडली होती हे मात्र बापाला आत कुठे तरी खुपत होतं. सारखा म्हणायचं आता पिक गेलं कि सगळा व्यवस्थित होईल, तुमची शाळाही सुरु होईल.

सगळं व्यवस्थित चालू होता, पण त्यादिवशीची रात्र फारच विचित्र होती, त्यादिवशी संध्याकाळपासूनच आकाशात चारी बाजूनी ढग जमले होते, विजा चमकत होत्या, ढगांचा गडगडता आवाज काळजाचा ठोका चुकवत होता. रात्रभर पाऊस कोसळत होता कि वाटावा जणू ढगफुटीच झाली आहे. बापाचा रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही, रात्रभर येरझार्या घालत तो देवाला, नशिबाला शिव्या देत होता. उभ्या राहिलेल्या पिकावर असं आभाळ फाटल्यासारखा पाऊस म्हणजे संपूर्ण मेहनत, कष्ट, सगळं सगळं वाया. हा अवेळी पाऊस सतत चार दिवस पडत होता, सगळ्या शेतात पाणी भरलं, उभी पिकं आडवी झाली, बरीचशी सडली उरलेली काळी पडली. त्या उजाड शेताकडे पाहून बाप लहान मुलासारखा रडला, त्या दिवसा नंतर त्यांनी बोलणंच सोडलं, शेताकडे तासंतास बघत राहायचा, कुठे जायचा नाही यायचा नाही, झोपायचा नाही. परिस्थिती कधी कधी माणसाला अगदी माकड बनवते आणि त्याच्या माकड चाळ्यानची मजा पण पाहत बसते. काही दिवसापूर्वी ज्या पावसानी बापामध्ये उत्साह संचारला होता, उमेद जागवली होती त्याच पावसानी आज बाप पुरा कोसळून गेला होता.

आज सकाळी मायच्या किंचाळीन जाग आली, शेतात बाप पडला होता, बाजूला कीटकनाशकाची बाटली होती, त्या विषानी काळानिळा पडलेल्या त्याच्या चेहेर्याकडे पाहवत नव्हतं. खिशात चिट्ठी होती.

"मी हरलो, माझ्या नशिबापुढे! उभ्या आयुष्यात सुखाचे चार दिवस नाही देवू शकलो. पोरांचं शिक्षण थांबलं, मनी चा लग्न लांबलं. ह्याला मी जबाबदार आहे. हे शापित, दळभद्री आयुष्य मी संपवतो आहे. निदान तुमचं बाकी आयुष्यातरी सरकारनी दिलेल्या दीड लाख रुपयावर सुखी होईल"    
------------------------------------------------------------------------------------------------------

सध्या इतर भ्रष्टाचाराच्या गोंधळात टीव्ही आणि वर्तमानपत्रातून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या अतिशय गौण बनल्या आहेत. बऱ्याच लोकांच्या नजरेसही त्या पडत नसतील...पण वस्तुस्थिती फार वेगळी आहे, ह्या दुर्दैवी घटना अजूनही थांबलेल्या नाहीत. जो अन्न पिकवतो तोच इतका दुर्लक्षित राहिला तर पुढे काय?
कर्जमाफी फक्त बँकांमधून कर्ज घेतलेल्यांची झाली सावकार किंवा तत्सम कुणाकडून घेतलेल्यांची नाही. तुलनेनी अशा गावाच्या सावकाराकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूपच जास्त आहे. हे असाच चालू राहिला तर खायचा अन्न देखील भारताला आयात करावं लागेल यात शंका नाही.